गोवंश वाहतूक करणारा कंटेनर गेवराई पोलिसांच्या ताब्यात.
गोरक्षक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे 27 गायींची सुटका.

गेवराई (प्रतिनिधी): राज्यात गोवंश कत्तल बंदी कायदा लागू असतानाही बीड जिल्ह्यातून कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गोरक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारा कंटेनर ट्रक अडविण्यात आला आणि तो गेवराई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
गुप्त मिळालेल्या माहिती आधारे दिनांक १५ जुलै २०२६ रोजी गेवराई पोलिसांनी MH-04-GJAR-8399 क्रमांकाचा कंटेनर ट्रक पडळशिंगी जवळ आडवून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश आढळल्याने ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये कोणतीही वैध परवानगी नसताना 27 गोवंश जनावरे कोंबून भरल्याचे आढळून आले.
या कारवाईत एक ट्रक व 27 गोवंश जनावरे असा एकूण सुमारे ₹36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या सर्व गायींची सुखरूप सुटका करून त्यांना गोशाळेत हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी प्राणी संरक्षण तसेच लागू असलेल्या संबंधित कायद्यांनुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
गोवंश कत्तल बंदी असतानाही अशा प्रकारची अवैध वाहतूक होत असल्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वाहतूक साखळीचा शोध आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या आदेशावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.





