पुन्हा भटक्या कुत्र्याचा नागरिकावर हल्ला.
विद्यार्थी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण;भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात नगरपालिका उदासीन.

बीड,( प्रतिनिधी )दिनांक २३ एप्रिल गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील पेठ बीड पोलीस स्टेशनसमोरील रस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने दुचाकी वरून घराकडे जात असलेल्या एका नागरिकावर हल्ला केल्याची घटना घडली. या परिसरात सतत भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वीच याच भागातील अनुष्का जावळे या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला केला होता ही घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा कुत्र्याने हल्ला केल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बीड भागातील पेठ बीड एकता नगर भागातील रहिवासी आप्पासाहेब मिसळे हे दुचाकीवरून घराकडे जात असताना अचानक काही भटके कुत्रे त्यांच्या आडवे आले. यावेळी दोन-चार कुत्र्यांच्या झुंडीतील दोन कुत्र्यांनी त्यांच्या दोन्ही पायांवर चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
अचानक कुत्र्यांनी हल्ला केल्याने काही काळ गोंधळ उडाला. सुदैवाने इतर मोठी दुर्घटना टळली असली तरी अशा घटनांमुळे शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
विशेष म्हणजे, या भागात यापूर्वीही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. दिवसेंदिवेशन बीड शहरातील कुत्र्याने हल्ल्याच्या केल्याच्या घटनात वाढ तरी देखील नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यावरून जाणेही धोकादायक बनत चालले आहे.
स्थानिक नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड नगरपालिकेकडे वारंवार भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अश्या तक्रारी करूनही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. त्यामुळे तातडीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





