

*अंबाजोगाईत टोल नाक्यावर टोळक्याचा धुडगूस; कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत लाखोंची तोडफोड!*
अंबाजोगाई तालुक्यातील सेलू आंबा टोल नाक्यावर शनिवारी पहाटे एका टोळक्याने दहशत निर्माण करत मोठी तोधफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुख्य आरोपी बालाजी चाटे आणि त्याच्या तीन साथीदारांनी टोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून राडा घालत दोन बूथच्या काचा आणि संगणक यंत्रणेचे सुमारे २ लाख रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री १:२० च्या सुमारास एका काळ्या रंगाच्या टाटा हॅरियर गाडीतून आलेल्या या आरोपींनी हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने धुमाकूळ घातला. यावेळी कर्तव्यावर असलेले टोल कलेक्टर विठ्ठल राठोड यांना आरोपींनी बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी वापरत असलेल्या गाडीच्या नंबर प्लेटमध्ये वारंवार फेरफार केला जात असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गाडीची तक्रार केल्यास जिवंत न सोडण्याची धमकीआरोपींनी शिफ्ट इन्चार्जला दिली. या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप पुढील तपास करत आहेत.



