तहसीलदार बीड एसीबीच्या जाळ्यात.
6 लाख 40 हजारची लाच घेताना तहसीलदार रंगेहात पकडला;अधिकाऱ्यांनी लाजा सोडल्या.

बीड जिल्ह्यात लाचखोराच्या प्रमाणात काही कमी होताना दिसत नाही. महसूल विभागाचा मोठा मासा गळाला लागल्याने एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांना लाखोचा पगार असताना देखील लाच घेण्याची वेळ आल्याने अधिकाऱ्यांनी लाजा सोडल्यात का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आजचा दिवस लाचखोर कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी विशेष ठरला असून, एका दिवसात दोन धडक कारवायांनी प्रशासनात खळबळ उडाली आहे. सकाळी नेकनूर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जाळ्यात अडकवले होते. त्यानंतर सायंकाळी अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच घेताना बीड एसीबीने रंगेहात पकडले.
माहितीनुसार, अंबड परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदाराकडे चालत असलेल्या वाहन,पोकलंड मशीनवर कारवाई न करण्यासाठी तसेच सहा हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी संबंधित तक्रारदाराकडे तब्बल 7 लाख रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने एसीबीने सापळा रचला. तडजोडीनंतर ६ लाख ४० हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली.
ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दरम्यान, सकाळी नेकनूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर झालेल्या कारवाईनंतर सायंकाळी तहसीलदार अटकेत गेल्याने “आजचा दिवस लाचखोरांसाठी काळा दिवस” अशी चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे.
ही कारवाई सोपान चिटमपल्ले, मॅचिंद्र बीडकर, प्रदीप सुरवसे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी यांनी केली.






