
बीड(प्रतिनिधी)बीड शहरातील खंडेश्वरी रोड परिसरातील साईनगर येथे तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 8 मे) सकाळी सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
वैभव दीपक बुरांडे (वय 29, रा. साईनगर, आकाशवाणी पेठ, बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मजुरीचे काम करत होता. वैभव याने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेनंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
तरुणांमध्ये वाढता मानसिक ताण, राग अनावर होणे, तसेच तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता यामुळे अनेक जण टोकाचे पाऊल उचलत असल्याची चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
अलीकडच्या काळात छोट्या-छोट्या कारणांवरून तरुण नैराश्यात जात असल्याचे दिसून येत आहे. संयमाचा अभाव, कौटुंबिक तणाव, आर्थिक अडचणी आणि व्यसनांच्या आहारी जाणे यामुळे आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता सामाजिक स्तरातून व्यक्त केली जात आहे.
समाजातील विविध घटकांनी तरुणांनी अडचणींना धैर्याने सामोरे जावे, कुटुंबीयांनी संवाद वाढवावा आणि व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे.
आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैभव हा मनमिळावू आणि मोकळ्या स्वभावाचा असल्याने परिसरात परिचित होता. त्याच्या पश्चात आई, बहीण व भाऊ असा परिवार आहे.






