माजलगावमध्ये गोवंश साठ्यावर पोलिसांचा छापा.
आठ गोवंश जप्त,दोन आरोपी ताब्यात; PAI मुदीराज यांनच्या पथकाची धडक कारवाई

बीड (प्रतिनिधी) राज्य सरकारने गोवंश वाहतूक व कत्तल करण्यावर बंदी घातली असताना देखील बीड जिल्ह्यातील बहुतांश कत्तलखान्यामध्ये गोवंशाची कत्तल करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. मागील आठवड्यातच बीड येथील कत्तलखान्यावर मोठी कारवाई करून जवळपास 50 गोवंशची सुटका करण्यात आले होते.
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मनुर येथे गोवंश साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाडसी कारवाई करत तब्बल ८ गोवंश (गाय व बैल) ताब्यात घेतले. या कारवाईत अंदाजे ३ लाख रुपयांचा गोवंश जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ मे २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मौजे मनुर येथे छापा टाकण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत संशयास्पदरीत्या कत्तलसाठी ठेवण्यात आलेले ८ गोवंश आढळून आले. त्यानंतर संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
राज्यात गोवंश हत्येवर बंदी असताना, जिल्ह्यात विविध भागांत अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीच्या घटना समोर येत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नियमांचे उल्लंघन करून अवैधरित्या गोवंश वाहतूक, साठवण किंवा कत्तल केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिस प्रशासनाने अशा प्रकरणांवर सातत्याने धडक मोहीम राबवून गोवंश तस्करीला आळा घालावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, पोलीस उपविभागीय अधिकारी चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुदीराज यांच्या पथकाने केली.






