ब्रेकिंग न्यूज

गावच्या राजकारणावरून स्मशानभूमितच मारामारी

चिंचोली- केज.....!

गावच्या राजकारणावरून दोघांनी स्मशानभूमीतच केली हाणामारी

अंबाजोगाई- प्रतिनिधी:—

केज-गावच्या राजकारणावरून झालेल्या वादातून स्मशानभूमीतच दोन व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे घडली आहे. १० जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचोली माळी येथील रहिवासी हेमंत श्रीपती घोडके हे गावाशेजारील स्मशानभूमीजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाच्या सावलीत बसले होते. त्याच वेळी गावातील तुकाराम दादाराव गालफाडे तेथे आले. दोघांमध्ये गावच्या राजकारणावर चर्चा सुरू असताना अचानक वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले. हेमंत यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केला असता, संतप्त झालेल्या तुकाराम यांनी त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता तुकाराम यांनी लाकडाने हेमंत यांच्या हातावर आणि पायावर बेदम प्रहार केले. या मारहाणीत हेमंत जखमी झाले.

या घटनेमुळे शांत असलेल्या ग्रामीण भागात राजकारणाचा विळखा किती घट्ट आणि उग्र झाला आहे, याचे विदारक चित्र समोर आले आहे. हेमंत घोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलिसांनी संशयित आरोपी तुकाराम गालफाडे याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. ३६८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button