बीड शहरातील अतिक्रमण धारकांवर कडक कारवाई.
शंभराहून अधिक अतिक्रमण धारकाला दणका;अतिक्रमण विरोधी कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची गरज.

बीड (प्रतिनिधी) – शहरातील वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा वाहतूक शाखा व नगरपालिकेद्वारे बीड शहरातील सुभाष रोड मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांविरोधात विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत 100 पेक्षा अधिक अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
फेब्रुवारी व जून महिन्यात प्रशासनाने यापूर्वी कठोर कारवाई करत व्यापार्यांना व हातगाडे यांना स्पष्ट इशारा दिला होता. तरीही पुन्हा मुख्य रस्ते, ओटे, हातगाड्या, पत्र्याचे शेड, टपऱ्या उभ्या राहू लागल्याने प्रशासनाने संयुक्त मोहीम राबविली.
साठे चौक, बस स्टॅंड, सुभाष रोड, माळीवेस यांसह प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक जागेचे व्यापारीक अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय वाढत होती. आजच्या कारवाईनंतर रस्ते मोकळे झाल्याने वाहतूक सुरळीत झाली आणि रस्ते रुंद झाल्याचा अनुभव नागरिकांनी व्यक्त केला.
कारवाई दरम्यान उपस्थित अधिकारी एपीआय सुभाष सानप,पीएसआय विजय जाधवर,पो. हवालदार आदिनाथ मुंडे,पो. अंमलदार संजय टुळे, चिंतामण शिंदे, राहुल घाडगे,संतोष मोरे, चालक संतोष हारके नारायण वाघमारे, शेख मॅडम नगरपालिकेचे अतिक्रमण प्रमुख पथक प्रमुख मुन्ना गायकवाड, पवन लाहोट, लखन तूसांबड , विकी गागट, राम रोकडे, सुजित जाधव, अविनाश दुलगत यांनी केली.
“या पुढे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण रस्त्यावर दिसल्यास आणखी कठोर कारवाई केली जाईल. व्यापारी व हातगाडे चालकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे, अन्यथा मोहीम थांबणार नाही.”
संपूर्ण शहरात सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचा निर्धार असल्याचे स्पष्ट दिसले. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळवेस, धोंडीपुरा, बार्शी नाका, तेलगाव नाका, नगर नाका या मुख्य रस्ता व चौकातील देखील अतिक्रमणे काढावे अशी नागरिकाकडून मागणी होत आहे तरी पोलीस व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सातत्याने कारवाई सुरू ठेवण्याची गरज आहे.







