बीड शहर हादरले;आदित्य महाविद्यालयात विद्यार्थ्यावर मारहाण चाकू हल्ला.
विद्यार्थ्यांच्या छातीवर चाकूने वार,हात फ्रॅक्चर

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील नामांकित आदित्य महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांमधील वादाचे गंभीर रूपांतर होत चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय देशमुख या विद्यार्थ्याने आदित्य सुनील गाडे या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गाडे यांच्या छातीवर वार झाला असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने, गाडे यांच्या मित्राने प्रसंगावधान राखत पुढील वार होण्यापासून त्यांना वाचवले.
जखमी विद्यार्थ्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अक्षय देशमुख याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महाविद्यालय परिसरात अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाने सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, संबंधित विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करावी तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शिस्तीचे नियम कडक करावेत, अशी मागणी केली आहे.
महाविद्यालय प्रशासनानेही या घटनेकडे गांभीर्याने पाहत अंतर्गत चौकशी सुरू केली असून शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत दिले आहेत.







