शेतात जाताना महिलेवर जीवघेणा हल्ला;जीवे मारण्याची धमकी.
पोलिसांनी तक्रारीची दाखल न घेतल्याने पुन्हा महिलेवर जीवघेणा हल्ला.

बीड (प्रतिनिधी)बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे शेतात जात असताना एका महिलेला व पतीला अडवून पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तीन दिवसापूर्वीच नेकनुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असतानाही पोलिसांनी दखल न घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.
लिंबागणेश येथील रहिवासी उषा शिवाजी फाळके (वय 40 वर्ष) या महिला दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शेतात जात असताना त्यांना अडवून महादेव गोपाळ जाधव, बाबासाहेब महादेव जाधव, गणेश महादेव जाधव, अर्चना महादेव जाधव व गौळण महादेव जाधव यांनी इतर साथीदारांसह मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्यांच्या चेहऱ्यावर चाकूने वार केल्याचेही सांगण्यात येत आहे.
या घटनेच्या तीन दिवस आधीच उषा फाळके यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याच्या धमकीबाबत तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे आरोपींचे मनोबल वाढले आणि थेट मारहाणीची घटना घडल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सध्या उषा फाळके यांच्यावर बीड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या चेहऱ्यावर व शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपींना अभय दिल्याचा आरोप करत आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी केली आहे. अद्याप नेकनुर पोलीस ठाण्याचा एकही पोलीस कर्मचारी जबाब घेण्यासाठी आला नसल्याचे देखील तक्रार फाळके यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे लिंबागणेश परिसरात संतापाची लाट पसरली असून पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, तसेच तक्रार देऊन देखील दखल न घेतलेल्या पोलिसावर देखील चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी फाळके कुटुंबीयांनी केली आहे.








