
बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील माऊली नगर, पाठक मंगल कार्यालयासमोर, नगर रोड परिसरातून १७ वर्षीय सागर साईनाथ जाधव हा अल्पवयीन मुलगा गेल्या पंधरा दिवसापासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. दि. २३ जानेवारी २०२६ रोजी, शुक्रवारी सकाळी सुमारे ७.३० वाजल्यापासून तो घरातून कोणालाही न सांगता निघून गेला असून त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा बाहेर पडताना त्याच्यासोबत क्रिकेटची संपूर्ण साहित्य असलेली मोठी किट बॅग घेऊन गेला होता. सुरुवातीला तो मित्रांकडे किंवा खेळासाठी गेला असावा असा कुटुंबीयांचा अंदाज होता. मात्र उशीर होत गेल्यानंतर शोधाशोध सुरू करण्यात आली. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ओळखीच्या ठिकाणी चौकशी करूनही त्याचा काहीच मागमूस लागला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
मुलगा बेपत्ता होऊन तब्बल बारा दिवस उलटल्याने कुटुंबीय व नातेवाईकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, मुलगा हरवल्याच्या धक्क्याने त्याच्या आईची प्रकृतीही खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सागरचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी आर्त विनंती कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
सागर कोणाला कुठेही आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक:
साईनाथ जाधव – ९०११७४३२२२
रामेश्वर गायकवाड – ८४८४०३८९०३
अशोक जाधव – ९८५०५६९३२९
माहिती देणाऱ्यांचे कुटुंबीयांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी सहकार्य करून मुलगा सुखरूप परत मिळवून देण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










