पाणी गळती होऊन लाखो लिटर पाणी गटारात !
गटारातील पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून,नागरिकांच्या आरोग्यास धोका.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असताना दुसरीकडे नगरपालिकेच्या ढिसाळ व निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाणी गटारात वाहून जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड शहरातील बार्शी रोडवरील धांडे नगर कमानीजवळ मुख्य पाईपलाईन गटारातून जात असून ती ठिकठिकाणी गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
विशेष म्हणजे, ही पाईपलाईन थेट गटारात असल्याने गटारातील दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आजारांचा धोका वाढला आहे. तसेच ते पाणी उडताना दिसू नये म्हणून त्याच्यावर कपडा टाकला आहे.
एकीकडे जिल्ह्यात अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा केला जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बीड नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती विपरीत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शहरातील अनेक भागांत गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांनी बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित गळती दुरुस्त करून दूषित पाणीपुरवठा थांबवावा, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे.






