
बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात बुधवारी (दि. 1 एप्रिल) दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाची सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
बीड शहरालगतच्या पाली गावात सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास वीज पडून वसंत रामराव राऊत (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.
बुधवारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू असून शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
दरम्यान, वसंत राऊत यांचा विज कडून मृत्यू झाल्याने पाली गावात शोककळा पसरली असून राऊत यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. पंचनामा करण्यासाठी महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.






