संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी काही तासांसाठी बाहेर येणार.
14 महिन्यांनंतर आरोपी जेलच्या बाहेर येणार;पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त.

बीड( प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सरपंच देशमुख हत्या हत्या झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रात आंदोलन मोर्चे झाले होते. या हात्येचा खटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी लढावा अशी मागणी देशमुख कुटुंबीय व आंदोलनकर्त्यांनी केली होती. त्यामुळे हा खटला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे आहे. या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी नुकतीच जिल्हा व विशेष न्यायालयात पार पडली असून, खटल्यातील कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला सध्या अंतिम टप्प्यात असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील तारीख २४ मार्च निश्चित केली आहे.
दरम्यान, या सुनावणीदरम्यान एका नव्या अर्जामुळे चर्चेला उधाण आले. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या जयराम चाटे याने न्यायालयाकडे विशेष विनंती अर्ज दाखल केला होता. आपल्या भावाचे निधन झाल्यामुळे त्यानंतरचे धार्मिक विधी पार पाडण्यासाठी काही काळासाठी बाहेर जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्याने केली होती.
या अर्जावर सुनावणी करत न्यायालयाने १३ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत जयराम चाटे याला कडक पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. तब्बल 14 महिन्यांनी देशमुख हत्तीतील आरोपी बाहेर येणार असून पोलीसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.
कडक अटी आणि ‘खर्च’ आरोपीचाच !
न्यायालयाने केवळ परवानगी दिली नाही, तर त्यावर काही कडक ताशेरे आणि अटीही लादल्या आहेत. आरोपीला संरक्षण देण्यासाठी तैनात केल्या जाणाऱ्या पोलीस पथकाचा सर्व खर्च जयराम चाटेला स्वतःला करावा लागणार आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्याला पुन्हा कारागृहात हजर व्हावे लागेल. या काळात कोणतीही प्रक्षोभक कृती किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.
या पार्श्वभूमीवर १३ मार्च रोजी संबंधित ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी २४ मार्च रोजी होणार असून, अंतिम निकालाकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.




