टोल नाक्यावर बांगर कुटुंबावर जीवघेणा हल्ला.
हल्ल्यात चार जखमी,हल्लेखोरांना अटक न केल्यास टोल नाका बंद करू.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील वैध किन्ही (ता. पाटोदा) येथील टोल नाका परिसरात रात्री दिनांक २९ डिसेंबर रोजी वादातून बांगर कुटुंबीयांवर बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका महिलेसह तीन पुरुष गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टोल नाका परिसरात शेतात उभारण्यात आलेल्या हॉटेलच्या उद्घाटनावरून वाद झाला. “तुझ्या शेतात हॉटेल का बांधले? उद्या उद्घाटन कसे करतोस ते पाहतोच,” अशा धमकीवजा भाषेतून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी बांगर कुटुंबावर अचानक हल्ला चढवत काठी, लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.
या हल्ल्यात बांगर कुटुंबातील एका महिलेला तसेच तीन पुरुषांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून समाजबांधवांनी संताप व्यक्त केला आहे. हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
जखमी बांगर कुटुंबीयांनी हल्लेखोरावर कडक कारवाईची मागणी केली आहे.आरोपींना अटक केली नाही तर टोल नाक्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असून टोलनाका देखील बंद करण्यात येणार असल्याचा इशारा बांगर कुटुंबियांनी दिला आहे.







