ब्रेकिंग न्यूज

बिबट्याची दहशत वाढल्याने वनविभाग सतर्क मोडवर.

गावोगावी जाऊन वनविभागाचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले करून शिकार केल्याच्या घटना समोर आल्या असून काही शेतकऱ्यांवरही बिबट्याने हल्ले केल्याचे प्रकार घडले आहेत यामुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 दोन दिवसापूर्वीच लिंबागणेश परिसरात रात्रीच्या वेळी एका शेतात जवळ रस्त्याच्या बाजूला बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर वनविभाग सतर्क मोडवर आला असून बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून गावोगावी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे.

बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील पिंपरनई गावात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांना बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले. रात्री एकटे शेतात जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित गोठ्यात ठेवावीत, जंगलालगतच्या परिसरात विशेष काळजी घ्यावी तसेच बिबट्याचा वावर दिसल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वनविभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button