ब्रेकिंग न्यूज

पावसाचा कहर ! धांडे नगर पुन्हा पाण्यात.रस्त्यावरून वाहते नदी.

अतिक्रमण व नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे हाल,पावसाळा पूर्वीचे नियोजन फेल.

बीड : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून बीड जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून विशेषतः शहरातील व्हीआयपी समजला जाणारा धांडे नगर भाग तळ्यात परिवर्तित झाला आहे. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे, तर व्यापारी व लहान उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

लाखोंचे नुकसान :

धांडे नगर परिसरात अनेक दुकाने, गॅरेज आणि हॉटेलमध्ये पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनं वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे अडकून पडली आहेत. सामान्य नागरिकांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे, कारण पिण्याच्या पाण्यापासून घरगुती वस्तूंपर्यंत सगळे जीवन विस्कळीत झाले आहे.

अतिक्रमण आणि नाले बंद :

या भागातील प्लॉटचे भाव गगनाला भिडलेले असतानाही मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. नियोजित ६० फूट रस्त्याऐवजी अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. नाल्यांवर झालेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे पावसाचे पाणी नाल्यातून वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर आले आहे. परिणामी वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांमध्ये संताप आहे.

तहसीलदारांची पाहणी :

आज तहसीलदारांनी या भागाला भेट दिली असता त्यांची गाडीच पाण्यात बंद पडली. यावरून परिस्थिती किती बिकट आहे याचा अंदाज येतो. नागरिकांनी प्रशासनावर जोरदार नाराजी व्यक्त केली असून “प्रशासन फक्त कागदावरच काम करते, प्रत्यक्षात मात्र नागरिकांना पावसात पोहावं लागतं” अशी टीका केली आहे.

नगरपालिकेचे नियोजन फेल :

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि जलनिकासी योजनेचा दावा नगरपालिकेकडून केला जातो. मात्र यंदाही ते फसले आहे. ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना पावसात प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. धांडे नगरसारख्या महत्त्वाच्या भागाची ही अवस्था असल्यास इतर भागातील नागरिकांचा काय हाल होत असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासनाचा इशारा :

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, अनावश्यक बाहेर पडणे टाळावे व नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क रहावे. मात्र नागरिकांचा प्रश्न असा आहे की, प्रत्येक वर्षी दिल्या जाणाऱ्या अशा सूचनांपेक्षा ठोस उपाययोजना केव्हा होणार?असा प्रश्न सर्वसामान्य बीड शहरातील नागरिकांना पडला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button